Belagavi

सोमवारच्या पावसाने जनजीवन विस्कळीत : दुकानात पाणी शिरून चार-पाच लाखांचे नुकसान

Share

कालच्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर-परिसरात गोंधळ उडाला. पावसामुळे उपनगरे जलमय झाली होती. बेळगावातील शहापूर येथील एका टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले.

सोमवारी संध्याकाळी बेळगावात विजेच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बेळगाव शहरात पावसामुळे तारांबळ उडाली. शहापूर-गणेशपुर गल्ली येथील शिल्पा मगावी यांच्या मालकीच्या टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने टेलरिंग दुकानातील साहित्य, महागड्या सिल्क साड्या आणि लग्नाचे कपडे खराब झाले. यामुळे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या भागातील गटारी कचऱ्याने भरल्या आहेत. पाणी वाहून जाण्यास गटारीत वाट नाही. अनेकदा तक्रारी करूनही, याची दखल घेतली गेली नाही, अशी तक्रार शिल्पा मगावी यांनी केली आहे. घरे बांधण्यासाठी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाळले जाते. ते गटारीत पडून गटारांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नव्हती आणि यामुळे पावसाचे तुंबलेले पाणी दुकानात शिरून लाखोंचे नुकसान झाले, असे शिल्पा मगावी यांनी म्हटले आहे .

पहिल्याच पावसामुळे बेळगावात गोंधळ उडाला असून महापालिका स्वच्छता विभागाचाही पुरता बोजवारा उडाला आहे.

Tags: