ग्रामविकास प्रकल्पाचा मूळ उद्देश ग्रामीण जनतेला स्वयंअर्थसहाय्यित संस्थांच्या स्थापनेद्वारे आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे आहे, अशी प्रतिक्रिया धारवाड प्रादेशिक विभागाच्या संचालिका सौ. दयाशीला यांनी व्यक्त केली.
बेळगाव तालुक्यातील हलगा गावात धर्मस्थळ ग्रामविकास योजना संघातर्फे आयोजित श्री मंजुनाथ नवजीवन समितीच्या सामुहिक श्री वरमहालक्ष्मी पूजन व वर्धापन दिन कार्यक्रमाचे धारवाड प्रादेशिक विभाग संचालिका सौ. दयाशीला व मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या
धर्मस्थळ ग्रामविकास योजना संघाच्या संचालिका सौ. दयाशीला म्हणाल्या की, स्वयंअर्थसहाय्यित संस्थांच्या स्थापनेद्वारे ग्रामीण भागातील लोकांमध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा ग्रामविकास योजनेचा मूळ उद्देश आहे. राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे कमी वार्षिक व्याज दराने आगाऊ निधीचे वितरण आज करण्यात आले आहे.

विमा कार्यक्रम, कर्जाची परतफेड, तलावांचे पुनरुज्जीवन, देवस्थान नूतनीकरण, हिंदू स्मशान भूमी, शालेय इमारती बांधण्यासाठी अनुदान, सुज्ञाननिधी शिष्यवृत्ती, महिला सक्षमीकरणासाठी महिला ज्ञान विकास कार्यक्रम, शुद्धगंगा पेयजल प्लांट, दारूबंदी शिबिरे यांसारखे समुदाय विकास कार्यक्रम, कृषी प्रशिक्षण आणि सामाजिक वनीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रकल्पामुळे लोकांची सेवा करून निरोगी समाज निर्माण करण्यात मदत झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी ऍड. अण्णासाहेब घोरपडे यांनी मनोगत मांडले. धर्मस्थळ योजनेच्या माध्यमातून आमच्या गावातील लोक वाईट सवयीपासून मुक्त होऊन नवीन जीवन जगत असून, संघटनांच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास उंचावल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments