शहरातील तानाजी गल्ली येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याने देखावा पाहण्यासाठी आलेल्या महिलेची हरवलेली सोन्याची कर्णफुले तिला सुखरूप परत मिळवून देऊन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. याबाबतची माहिती अशी की तानाजी गल्ली मंडळांनी यंदा ॲनाकोंडा देखावा सादर केला आहे. सदर देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत.
अनंत चतुर्दशी तोंडावर आल्यामुळे सदर मंडळाच्या मंडपात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रभर पहाटे 4 पर्यंत ही गर्दी पहावयास मिळत आहे. या गर्दीमध्ये काल कित्तूर येथील सुमित्रा रोट्टी या महिलेच्या कानातील सोन्याची कर्णफुले हरवली होती. सुदैवाने मंडळाच्या एका बाल कार्यकर्त्याला आयुष विनायक पवार कर्णफुले सापडली. सोन्या -चांदीची जाण नसली तरी ही कांहीतरी मौल्यवान गोष्ट आहे हे त्या बालकाच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने ती कर्णफुले आपल्यापेक्षा मोठ्या कार्यकर्त्याकडे सुपूर्द केली.
दरम्यान संबंधित महिला हरवलेल्या दागिन्याची शोधाशोध करत तानाजी गल्ली श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात आली असता मंडळाचे अध्यक्ष राहुल मुचंडी, इंद्रजीत घसारी, राजू देसाई,यांनी शहानिशा करून हरवलेली कर्णफुले तिच्याकडे सुखरूप सुपूर्द केली. सध्या श्री गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
या गर्दीमध्ये बऱ्याच जणांच्या वस्तू हरवत असतात, तथापि सापडलेल्या त्या वस्तू संबंधितांना परत करून तानाजी गल्ली मंडळाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणा जपताना दिसत आहेत. या मंडळाच्या अनाकोंडा दिखाव्याचे समस्त गणेशभक्ताकडून कौतुक होत असताना हरवलेला सोन्याचा दागिना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल या कौतुकात अधिकच भर पडत आहे.
याला कारणीभूत तानाजी गल्ली सार्वजनिक श्री गणेश उत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष राहुल मुचंडी यांचे शिस्तबद्ध नियोजन कारणीभूत आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.


Recent Comments