माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे निधन झालं असून ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात निधन झालं. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.
उद्या पाथर्डीत अंत्यसंस्कार
मागील 12 दिवसांपासून न्युमोनिया आजारावर ते उपचार घेत होते. मात्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.
1994 मध्ये ते महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री होते. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावात 10 ऑक्टोबर 1937 ला एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवा समुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी नववीत असताना त्यांनी शाळा सोडून दिली.
विधिमंडळाच्या अधिवेशनात गॅलरीतून मारलेल्या उडीनं आयुष्याला कलाटणी
8 जुलै 1968 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कुठल्यातरी महत्वाच्या विषयावर बोलत होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून कसलासा आवाज झाला. खाली बसलेल्या आमदारांवर पत्रकांचा वर्षाव होऊ लागला. जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
गॅलरीतून खाली उडी मारायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडलं होतं. ते बबनराव ढाकणे होते, तेव्हापासून बबनराव ढाकणे हे नाव चर्चेत आलं. त्यानंतर एका उडीच्या प्रयत्नानं पाथर्डी तालुक्यातील अनेकांचं भविष्य उजळलं. पुढे राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते. तेव्हा त्यांची ओळख झाली या आधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.
1967 मध्ये राजकारणात पाऊल ठेवत टाकळीमानूर गटातून त्यांनी जिल्हापरिषदेसाठी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातुन ते 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पुढे ते पाच वेळेस आमदार राहिले.
त्याचवेळी पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणून तर 1979 पुलोद ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं. 1989 साली विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 10 नोव्हेंबर 1989 साली बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी केशरकाकू क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता.


Recent Comments