Belagavi

डोणवाड गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार

Share

त्या गावात उजाडले की पुरे, महिलांना घरकाम सोडून पाण्यासाठी भटकावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांसह जनावरांनाही पिण्याच्या पाण्याविना त्रास होऊ लागला आहे. कृष्णा नदी हाकेच्या अंतरावर असूनदेखील काही गावांमध्ये पाण्याविना लोकांचे हाल होत आहेत. अधिकारी व लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अखेर इतक्या गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे का? पाण्यासाठी गावकरी किती किलोमीटरची पायपीट करतात याचा हा वृत्तांत…


जीवाची पर्वा न करता खोल विहीरीतुन अत्यंत हिंमतीने पाणी खेचून आणणाऱ्या स्त्रिया, लहान मुले आणि
वृद्ध सायकलवरून किंवा पायी कित्येक किलोमीटर चालत डोक्यावर आणि कमरेत कळशा घेऊन चालली आहेत. ही सर्व दृश्ये बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील डोणवाड गावात पाहायला मिळाली


होय, गेल्या सहा महिन्यांपासून पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष सुरू असतानाही ना लोकप्रतिनिधी ना अधिकारी त्यांची दखल घेत आहेत. एकीकडे बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत तर काही बोअरवेलमधील पाण्याच्या थेंबासाठीही लोकांची धडपड सुरू आहे. नळात पाणी नसल्याने ते गावाबाहेर दोन किमी अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन पाणी आणतात. लहान मुले, महिला व वृद्धांना दररोज पाणी भरण्याची सवय लागली आहे. मोलमजुरी करायला जाणारेसुद्धा एक दिवस काम सोडून दिवसभर पाणी भरतात…


वीस फुटांपेक्षा जास्त खोल विहिरीतून महिला, वृद्धांना पाणी खेचावे लागते. जीवाची पर्वा न करता विहिरीवर जाऊन तिथून डोक्यावर, कमरेत आणि खांद्यावर घागरी घेऊन अनेक किलोमीटर चालत पाणी आणावे लागते. मुलेही सायकलवरून घरापर्यंत पाणी घेऊन जातात. माणसांबरोबरच जनावरांचीही येथे पाण्यासाठी धडपड सुरू आहे. गुरांना पाणी नसल्याने विहिरीतून पाणी आणले जाते. रोजचे काम सोडून केवळ पाणी भरण्याचे काम करणाऱ्या ग्रामस्थांनी गावासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. गावात जल जीवन अभियानांतर्गत घरोघरी नळ व्यवस्था आहे, पण बोअरवेल कनेक्शन नसल्याने नळ नाहीत. हे चित्र फक्त डोणवाड गावातच नाही तर शेजारील तीन-चार गावांमध्येही आहे. नजीकच्या कृष्णा नदीत पाणी असून तेथून पाणी पुरवून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे.

एकूणच या गावांतील लोक पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याच्या शोधात आहेत. पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी अनेकवेळा अधिकारी व स्थानिक आमदारांना विनंती करूनही त्यांची समस्या कोणीच ऐकून घेत नाही. स्थानिक आमदार दुर्योधन ऐहोळे आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाने जागे होऊन आणि या गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.

डी. के. उप्पार, आपली मराठी, चिक्कोडी

Tags: