कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून काळ्या दिनाची निषेध फेरी काढता आली नाही. यंदा मात्र कोणाच्याही परवानगीची प्रतीक्षा न करता निषेध फेरी निघणारच असून या फेरीतून मराठी माणसांची अस्मिता केंद्र सरकारला दाखवून देण्यात येईल, असा निर्धार बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत करण्यात आला.
रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस या कार्यालयात बेळगाव शहर समितीची सोमवारी (दि. 17) बैठक झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बी. ओ. येतोजी होते.
मराठी माणसांना अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ दरवर्षी 1 नोव्हेंबर काळादिन पाळण्यात येतो. दोन वर्षे कोरोनामुळे फेरी निघाली नाही. पण, यंदा विराट फेरी काढण्यात येईल. कितीही संकटे आली तरी फेरी यशस्वी करण्यात येणार आहे. 23 नोव्हेंबरला सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधी लोकेच्छा दाखवून देण्यासाठी मराठी भाषिकांनी काळ्यादिनाच्या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.
प्रकाश मरगाळे म्हणाले, प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा न पाहता आम्ही काळ्यादिनाची फेरी काढणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रमात न पडता फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. समितीचे संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. येणारी विधानसभा निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्वनाथ सूर्यवंशी, मदन बामणे, अॅड. अमर येळ्ळूरकर, अमित देसाई, चंद्रकांत कोंडुसकर, रामा शिंदोळकर, श्रीकांत मांडेकर, रणजीत हावळान्नाचे, प्रकाश नेसरकर, शिवानी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एतोजी यांनी काळ्यादिनाची फेरी यशस्वी करण्याचे आवाहन केले. रणजीत चव्हाण-पाटील यांनी आभार मानले.
या बैठकीला नगरसेवक रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, शिवराज पाटील, विकास कलघटगी, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments