बेळगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करून होणार असलेल्या रिंगरोड विरोधातील न्यायालयीन लढाई तीव्र करण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे.
प्रस्तावित रिंग रोडविरोधात शेतकऱ्यांमधून आक्षेप मागवून आंदोलन उभारण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. बेळगावातील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि बेळगाव तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तावित रिंगरोडसाठी ३१ गावातील सुपीक जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला एकमुखी विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, प्रस्तावित रिंगरोडमुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यात प्रामुख्याने मराठी भाषिक शेतकरी अधिक आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी सर्वानी एकसंघपणे लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, एस. एल. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, संतोष मंडलिक आदींनी विचार व्यक्त केले.


Recent Comments