ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेंगळुरू विधानसभा येथे बैठक बोलाविण्यात आली असून सदर बैठक बेळगाव मधील सुवर्ण विधानसौध येथे घेण्यात यावी अशी मागणी नेगीलयोगी रयत सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात उसाचे कारखाने आहेत. येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. या संदर्भात ऊस दर निर्णयाबाबत साखर मंत्री, आयुक्त, सर्व कारखान्यांचे एमडी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करावी तसेच ही सभा बेळगावातील सुवर्णसौध येथे व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सदर बैठक बेंगळुरू येथे होत असल्याने यामुळे काही शेतकरी नेत्यांना येणे-जाणे अवघड होत आहे. त्यामुळे ही सभा बेळगावातच घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, नेगीलयोगी रयत सेवा संघाचे राज्य अध्यक्ष रवी पाटील म्हणाले, साखर मंत्री आणि आयुक्त यांनी बेंगळुरूमध्ये शेतकऱ्यांची बैठक बोलावली असून सदर बैठक बेळगावातच घेऊन उसाचा भाव निश्चित करण्यात यावा. अन्यथा अखंडित संघर्ष सुरु राहील कारखान्यांना उसामुळे अनेक प्रकारचे फायदे आहेत. मात्र कारखान्यांकडून दर आणि वजनातही शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे सरकारने उसाचा भाव किमान ४५०० रुपये निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी नेगीलयोगी संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील, राज्य कार्याध्यक्ष बसवराज मोकाशी, जिल्हाध्यक्ष चन्नाप्पा गणाचारी आदी उपस्थित होते.


Recent Comments