सीमाभागात विशेषतः बेळगावात १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन जवळ येताच पावसाळी अळंब्यांप्रमाणे कन्नड संघटनांना पेव फुटते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कन्नड भाषा आणि संस्कृतीचे रक्षक असल्याचा आव आणून धड मिसरूडही न फुटलेली पोरंटोरं बेताल वक्तव्य करतात. अशाचप्रकारे पीएफआयप्रमाणे म. ए. समितीवर बंदी घाला अशी मागणी कानडी पुंडानी केलीय.
पीएफआय संघटनेवर बंदी घालणे स्वागतार्ह आहे, त्याचप्रमाणे बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला अशी कोल्हेकुई कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाचा जिल्हाध्यक्ष आणि चित्रपट अभिनेते आर. अभिलाष याने केलीय.
बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना आर. अभिलाष याने बेळगावच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाला वीरराणी बेळवडी मल्लम्मा यांचे नाव देण्याची मागणी केली. स्मार्टसिटी प्रकल्पाच्या अनेक निविदांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे याबाबत त्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारने अनेक संस्थांवर बंदी घातली आहे. तसेच सीमावाद चिघळवून बेळगावात देशद्रोहाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी. बेळगावात विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आयटीबीटी कंपन्या स्थापन कराव्यात, अशी मागणी त्यांने केली.
यानंतर करवे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. यावेळी मंजुनाथ शेट्टर, विनय चंदरगी, राजू कलपत्री, सिद्धू आदी उपस्थित होते.


Recent Comments