दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजापुरात यंदा पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी केवळ एनडीआरएफ पथक नाही तर आपणदेखील थेट जनतेपर्यंत पोहोचून मदतीचा हात देणारे विजापूरमधील आमदार एम बी पाटील हे जनतेसाठी एक आदर्श लोकप्रतिनिधी ठरत आहेत.
आमदार पदासह राष्ट्रीय पक्षाच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एम बी पाटील यांच्यावर जबाबदाऱ्यांचे मोठे ओझे आहे. मात्र अशा जबाबदाऱ्यांचा गुंत्यातून देखील स्वतः संकटग्रस्त जनतेपर्यंत पोहोचणे हे आपले कर्तव्य समजणाऱ्या एम बी पाटील यांनी आज वाहनातच अल्पोपहार घेत अनेकांचे लक्ष वेधले. नुकसानग्रस्त भागात पोहोचण्यासाठी वेळ न वाया घालवता आमदारांनी चक्क आपल्या वाहनातच न्याहारी केली.. त्यांचा या संदर्भातील फोटो सोशल साईटवर वायरल होत असून त्यांच्या या कार्यपद्धतीचे येथील जनतेतून कौतुक होत आहे. 
विजापूर जिल्ह्यातील अनेक गावात डोणी नदीमुळे पूर आला आहे. बबलेश्वर मतदार संघातील अनेक गावात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली असून येथील जनतेच्या मदतीसाठी एम बी पाटील यांचे बंधू चिरंजीवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह धावत आहेत. बंगळूरमध्ये काही कामानिमित्त गेलेल्या एम बी पाटील यांनी बेंगळूर हुन परतताच वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांनी गाडीत बसूनच न्याहारी केली. यानंतर त्यांनी हरनाळ, धन्याळ, कनमुचनाळ, सारवाड, काखंडकी, तोनश्याळ, होनगनहळ्ळी आदी गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जेवणाची वेळ झाल्यानंतर जेवणासाठी इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा घरातून आणलेले जेवणच त्यांनी आपल्या कारमध्ये बसून केले. आणि पुढील गावांचा प्रवास करत तेथील पूर परिस्थितीची पाहणी केली.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत असून एम बी पाटील यांचे जनतेप्रती असलेले प्रेम, त्यांची कार्यपद्धती या साऱ्याचे कौतुक होत आहे. बिहारमधील कोशी नदीला आलेल्या पुरानंतर पूर परिस्थिती निवारण्यासाठी केंद्र सरकारने अवलंबलेले मॉडेल डोणी नदी परिसरात राबविण्यात येणार असल्याचे आमदार एम बी पाटील यांनी सांगितले.
या भागातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या एम बी पाटील यांना या भागातील महिलांनी घेराव घालून येथील दारू दुकान बंद करण्यासाठी मागणी केली. अवैध दारू विक्रीमुळे गावची शांतता भंग होत असून अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे गाऱ्हाणे येथील महिलांनी मांडले. यावेळी तातडीने अबकारी विभाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून यासंदर्भातील माहिती जाणून घेतली. तसेच हा प्रकार थांबविण्यात येईल, असे आश्वासनही दिले.
डोणी नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला देण्यात यावा, अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे असा इशारा यावेळी एम बी पाटील यांनी दिला.


Recent Comments