श्री राम कॉलनी, आदर्शनगर रहिवासी संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गंगा -नारायण सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वार्ड नंबर ८ चे नगरसेवक मंगेश पवार, पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड तर प्रमुख वक्ते म्हणून आर .पी .डी. कॉलेजचे प्राध्यापक मायाप्पा पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष विलास घाडी तसेच व्यासपीठावर कार्याध्यक्ष एम एम पट्टनशेट्टी,आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नेहा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.. सुनिता घाडी व भावना खन्नूकर यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘जीवनात भरपूर मोठे व्हा ,मोठमोठी पदे प्राप्त करा पण त्याबरोबरच माणुसकी विसरू नका. आपल्या आई-वडिलांना विसरू नका. काही वर्षानंतर या गुणवत्ता विद्यार्थ्यापैकी एखादा येथे मोठा अधिकारी म्हणून येईल तेव्हा या सत्काराचा गौरव अधिक वाढेल’ अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
अनंत लाड यांनीहि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने प्रामाणिकपणे कष्ट करावे, वेळेचा सदुपयोग करून आयुष्यात यशस्वी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ते जीवनात अधिक सक्षमपणे यशस्वी होऊ शकतील असे मत नगरसेवक मंगेश पवार यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदीप चव्हाण, शंकर चौगुले, गोपाळ मिरजकर, प्रदीप जोशी, प्रकाश घाडी. जयवंत खन्नूकर, सुळेभावी, किसन शिंदे, कूसाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी एम घोरपडे यांनी केले. प्रस्तावना नेहा जोशी यांनी केली. पाहुण्यांची ओळख सौ. वर्षा घाडी यांनी तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी उमेश वाळवेकर यांनी केले. या सत्कार समारंभापूर्वी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.


Recent Comments