राज्यभरात एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पडल्या असून आता या परीक्षेच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी दिली.

बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विजापूर दौऱ्यावर आलेले शिक्षणमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अलमट्टी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले, २८ मार्च पासून सुरु झालेल्या परीक्षा संपल्या असून सर्व ठिकाणी सुरळीतपणे परीक्षा पार पडल्या आहेत.
केवळ एका परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याला डिबार करण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच ९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती परीक्षेसाठी नोंदविण्यात आली असून अनुपस्थित आणि पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही नेहमीप्रमाणेच होती. एप्रिल अखेरीस मूल्यमापन प्रक्रिया सुरु झाली होती. आता या परीक्षेचे निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे जूनच्या अखेरच्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेतदेखील विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गणवेश परिधान करून येणे आवश्यक असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले.


Recent Comments