DEATH

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे निधन

Share

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे पुण्यात निधन झाले.  त्या 70 वर्षांच्या होत्या.  गेल्या काही दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते.  मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.  2018 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4 हजारहून अधिक प्रयोग झाले. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. आपल्या आई, वडिलांच्या संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली . मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार मानल्या जायच्या.

कीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म पुणे येथे 16 ऑगस्ट 1952 रोजी झाला.

वडील आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्यामुळे संगीत व अभिनय यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले.

वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ मधून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले.

संगीत स्वरसम्राज्ञी, संत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी , स्वयंवर, मंदोदरी, संगीत सुभद्र, संशय कल्लोळ अशा अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका साकारल्या

कीर्ती शिलेदारांनी 27 नाटकांतून 34 भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत.

कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या 1900 च्या आसपास मैफली झाल्या.

महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) हे त्यांना मिळालेले काही मानसन्मान होत.

Tags: