Belagavi

केंद्र सरकारच्या विरोधात दलितांची निदर्शने

Share

 कोरोना संकट असूनही केंद्र सरकार दरवाढ करत असल्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी बेळगावात गुरुवारी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

देशात कोरोना संकट असूनही केंद्र सरकार इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे असा आरोप करून तातडीने दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी निदर्शक दलित कार्यकर्त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या संदर्भात बोलताना दलित संघर्ष समितीचे नेते संजय तळवलकर म्हणाले, भाजप सरकार लुटारू सरकार आहे. त्याच्या कुटील धोरणाच्या निषेधार्थ अनेकवार आंदोलने करण्यात आली आहेत. कोरोनामुळे अनेक लोकांनी प्राण गमावले तर अनेकांनी रोजगार गमावले आहेत. तरीही दरवाढ सुरूच आहे. लोकांना न्याय देण्यात हे सरकार कमी पडले आहे असा आरोप केला.

यावेळी राजू कांबळे, राजू पवार, सदानंद कांबळे, मल्हारी पागे, रवी कांबळे, संतोष प्रथमनावर यांच्यासह दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags: